लग्नाच्या बाराव्या दिवशीच नवविवाहितेला विष पाजून मारले
वृत्तसंस्था I का टा वृत्तसेवा
नांदेड : हुंड्यातील १ लाख रुपये न आणल्याने सासरच्या लोकांनी नवविवाहितेला लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांनी विष पाजून मारले. राठोडवाडी (अखरगा) (ता. मुखेड) येथे ही घटना घडली. ताऊबाई सुधाकर राठोड (१८) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह सासरा, सासू व दिरावर गुन्हा दाखल झाला. पती सुधाकरला अटक केली आहे.
वसूर तांडा येथील वामन चव्हाण यांची मुलगी ताऊबाई हिचे लग्न राठोडवाडी (अखरगा) येथील सुधाकर राठोडसोबत २ जुलैला झाले. लग्नात ६ लाख रुपये हुंडा व ३ तोळे सोने देण्याचे ठरले होते. मुलीचे वडील वामन चव्हाण यांनी लग्नावेळी ५ लाख रुपये हुंडा, एक तोळ्याची अंगठी व २ तोळ्यांचे लॉकेट दिले. लग्नानंतर मुलगी व जावयास परतणीसाठी बोलावले होते. त्या वेळी सुधाकरने हुंड्याचे राहिलेले १ लाख घेऊन ये, मला दूध डेअरी टाकायची आहे, अशी धमकी ताऊबाईला दिली. नंतर ती ९ जुलैला सासरी गेली.
त्यानंतर १० जुलैला सकाळी ७ वाजता ताऊबाईला उलट्या होत आहेत, लवकर या, असा निरोप मुलीच्या वडिलांना दिला. त्याप्रमाणे वामन चव्हाण मुलीच्या सासरी गेले. त्यानंतर ताऊबाईला मुखेडमध्ये प्राथमिक उपचार करून नदिडला व तेथून हैदराबादला हलवले. मात्र, उपचार सुरू असताना १३ रोजी सायंकाळी ६ वा. तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मुलीचे वडील वामन चव्हाण (रा. वसूर तांडा) यांच्या तक्रारीवरून मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणाने प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, कठोर शासन करण्याची मागणी होत आहे.












