भंडाऱ्यातील संजयनगर येथील घटना, नागरिकांचा वन विभागावर गंभीर आरोप
भंडारा : वनपरिक्षेत्र कार्यालय गोठणगाव नजीकच्या संजय नगर येथे आज (ता. २५) पहाटे पाच वाजताच्या दरम्यान स्वतःच्या घरी लघुशंकेला गेलेल्या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याने त्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वंश प्रकाश मंडल (वय ५) असे बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वंश आज पहाटे पाचच्या सुमारास झोपेतून उठून अंगणात लघुशकेला गेला दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घातली जवळ असलेल्या आजीने आरडा रोड केली, परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांनी धावपळ केली बिबट्याने जंगल परिसरात नेऊन त्याच्या मानेवर वार केला. दरम्यान बरीच आरडा ओरड झाल्याने वाघ चिमुकल्या वंशला जागेवरच टाकून पसार झाला. लागलीच गावकऱ्यांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे नेले मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
बिबट्याने दिवसेंदिवस घरी येऊन गायी, वासरांवर हल्ला चढवीत कोंबड्या खाल्ल्या यासाठी अनेक पशुपालकांनी वन विभागाकडे मदतीची मागणी केली. मात्र, वन विभागाने असमर्थता दर्शवली. वन्य प्राणी बिबट्या लहान मुलांना टार्गेट करत आहेत. अशा घटना होऊ नये यासाठी विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून वन विभागाने दखल घेत तातडीची उपाययोजना करण्याचे आव्हान केले होते. घटनेच्या दिवशी मृत मुलाचे आईवडील कामानिमित्त बाहेर होते. तो चिमुकला आपल्या आजी सोबत घरी होता. वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत वन विभागाने देवून त्या हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
वाघाचा बंदोबस्त करा, अन्यथा …
वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकदा मागणी करूनही वन विभागाकडून यावर कुठलीही उपाययोजना करण्यात येत नाही. यापूर्वी गोठणगाव येथील प्रदीप साखरे यांचा मुलगा व त्यानंतर युक्ता चंद्रशेखर निखारे हिला ता.३० मे रोजी अंगणातून तर तिसऱ्यावेळी इटियाडोह धरण बघायला आलेल्या चार वर्षीय विहान रॉय रा.दिनकरनगर या चिमुकल्या पर्यटकांवर ता.३० ऑगस्ट रोजी हल्ला करत उचलून नेवून गंभीर जखमी केले. आता चौथ्यांदा या घटनेत अंश प्रकाश मंडल याचा थेट जीवच घेतला यामुळे नागरिकात वन विभागा विषयी प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून त्याच्या बंदोबस्त करा. अन्यथा वन विभागाचा एकही कर्मचारी गावात परिसरात मोकळ फिरू देणार नाही असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.









