तामिळनाडूत थलपती विजय यांचा मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक; गृहखात्यासह महत्त्वाची मंत्रालये स्वतःकडे
मुख्यमंत्री झाल्यानंतर खातेवाटपात विजय यांचा धाडसी निर्णय; कायदा-सुव्यवस्था आणि नगरविकासावर थेट नियंत्रण
चेन्नई : तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर खातेवाटपात मोठा आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विजय यांनी गृह, पोलीस, नगरविकास यांसारखी अत्यंत महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवत प्रशासनावर थेट नियंत्रण ठेवण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

10 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर थलपती विजय यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आले असून, विजय यांनी घेतलेला निर्णय राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानली जाणारी गृह आणि पोलीस यंत्रणा स्वतःकडे ठेवून विजय यांनी प्रशासनावर मजबूत पकड ठेवण्याची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.

लोकभवनातून जाहीर करण्यात आलेल्या खातेवाटपानुसार, मुख्यमंत्री विजय यांच्याकडे गृह, पोलीस, नगर प्रशासन, शहरी विकास, जलपुरवठा, महिला व बालकल्याण, युवा कल्याण, ज्येष्ठ नागरिक कल्याण, दिव्यांग कल्याण, विशेष कार्यक्रम अंमलबजावणी, सामान्य प्रशासन, भारतीय प्रशासनिक सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), भारतीय वन सेवा (IFS) तसेच जिल्हा महसूल प्रशासन यांसारखी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.
राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर थेट नियंत्रण ठेवण्यासोबतच शहरी विकास आणि प्रशासनातील मोठे निर्णय स्वतःच्या नेतृत्वाखाली घेण्याचा विजय यांचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विरोधकांवर राजकीय वचक ठेवण्यासाठी तसेच प्रशासनात जलद निर्णयप्रक्रिया राबवण्यासाठी त्यांनी ही रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळातील इतर महत्त्वाच्या खात्यांचेदेखील वाटप करण्यात आले आहे. एन. आनंद यांच्याकडे ग्रामीण विकास आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. आधव अर्जुना यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि क्रीडा विकास विभाग सोपवण्यात आला आहे. डॉ. के. जी. अरुणराज यांच्याकडे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची धुरा देण्यात आली आहे.
तसेच के. ए. सेंगोट्टैयन यांच्याकडे अर्थ मंत्रालय, तर आर. निर्मलकुमार यांच्याकडे ऊर्जा संसाधन आणि विधी मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

थलपती विजय यांच्या या खातेवाटपामुळे त्यांच्या नेतृत्वशैलीची स्पष्ट झलक पाहायला मिळत आहे. प्रशासनातील महत्त्वाचे निर्णय स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवत त्यांनी मजबूत आणि केंद्रीकृत कारभाराचा संकेत दिला आहे. त्यामुळे आगामी काळात तामिळनाडूच्या राजकारणात विजय यांची कार्यशैली आणि निर्णयक्षमता याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.









