एसबीएल एनर्जी कंपनी पुन्हा सुरू करा

“रोजीरोटीचा प्रश्न निकाली काढा; एसबीएल एनर्जीज कंपनी पुन्हा सुरू करा”
३०० हून अधिक कामगारांची आमदार चरणसिंग ठाकूर यांच्याकडे मागणी

काटा वृत्तसेवा I गजेंद्र डोंगरे

बाजारगाव : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जीज लिमिटेड कंपनीतील स्फोट दुर्घटनेनंतर कंपनीचे उत्पादन बंद असल्याने शेकडो कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कंपनी पुन्हा सुरू करून रोजगाराचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी करत ३०० हून अधिक महिला-पुरुष कामगारांनी आमदार चरणसिंग ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

कामगारांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, एसबीएल एनर्जीज लिमिटेड ही कंपनी परिसरातील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. दुर्घटनेनंतर उत्पादन पूर्णपणे बंद झाल्यामुळे सुमारे १४०० हून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगारांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना करून कंपनीचे उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी कामगारांनी केली.

सुरक्षा उपाययोजना अनिवार्य – आमदार ठाकूर

कामगारांचे म्हणणे ऐकल्यानंतर आमदार चरणसिंग ठाकूर यांनी कंपनी व्यवस्थापन व प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. कंपनी सुरू करण्यापूर्वी कामगारांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्पादन प्रक्रियेदरम्यान आवश्यक सुरक्षा उपकरणे, प्रशिक्षण व्यवस्था तसेच आपत्कालीन उपाययोजना काटेकोरपणे उपलब्ध करून देणे कंपनीसाठी बंधनकारक असावे, असे त्यांनी सांगितले.

तसेच कंपनी परिसरात अग्निसुरक्षा व्यवस्था, प्राथमिक उपचार केंद्र, आरोग्य सुविधा, योग्य मार्ग व इतर मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कामगारांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची खात्री कंपनी व्यवस्थापनाने द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

मृत व जखमी कामगारांच्या कुटुंबांना मदत

स्फोट दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना कंपनीकडून ७५ लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपये आणि पंतप्रधान सहाय्यता निधीतून २ लाख रुपये अशी एकूण ८२ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच जखमी कामगारांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत आणि राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक सहाय्य देण्याबाबतही मागणी करण्यात आली आहे.

मृत कामगारांच्या कुटुंबीयांच्या खात्यात शासन व कंपनीकडून मंजूर केलेली मदत तातडीने जमा करावी, तसेच उपचार सुरू असलेल्या जखमी कामगारांच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी कंपनी व्यवस्थापनाने घ्यावी, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी केली.

कामगारांनीही सुरक्षा नियमांचे पालन करावे

यावेळी आमदार ठाकूर यांनी कामगारांनाही सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. उत्पादन प्रक्रियेदरम्यान सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असून कोणतीही बेपर्वाई टाळावी, असे त्यांनी सांगितले. कामगारांनीही जबाबदारीने काम करत सुरक्षिततेला प्राधान्य दिल्यास भविष्यात अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.

प्रशासनाशी चर्चा करून निर्णय

कंपनी पुन्हा सुरू करण्याबाबत कंपनी व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल, असे आश्वासन आमदार ठाकूर यांनी कामगारांना दिले. कंपनी सुरू झाल्यास परिसरातील शेकडो कुटुंबांना पुन्हा रोजगार मिळेल तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या भेटीदरम्यान चंद्रशेखर चिखले, सुभाष माहूरे यांच्यासह ३०० पेक्षा अधिक कामगार उपस्थित होते.

 

0
0

Leave a Reply

Realted News