एसबीएल एनर्जी स्फोट प्रकरण : मृतांचा आकडा 25 वर,
‘ज्योती शामू धुर्वे’ यांचा उपचारादरम्यान मृत्यू
मालक संजय चौधरीसह काही संचालक अद्याप फरार;
दोषी सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके व दारुगोळा तयार करणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. गंभीर जखमी असलेल्या ज्योती शामू धुर्वे (वय 22, रा. काटोल) यांचा रविवारी (15 मार्च) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, या दुर्घटनेतील मुख्य आरोपी आणि कंपनीचे मालक संजय चौधरी यांच्यासह काही संचालक अद्याप फरार असल्याने पोलिस तपासावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
1 मार्च 2026 रोजी राऊळगाव येथील या कारखान्यात भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत 18 कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर 24 कामगार गंभीररीत्या भाजले होते. जखमींवर नागपूरमधील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान ज्योती धुर्वे यांच्या मृत्यूमुळे मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. उर्वरित जखमींची प्रकृतीही चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
कामगार संघटनांचा संताप
या दुर्घटनेनंतर कामगार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कारखान्यातील सुरक्षा नियमांची प्रभावी तपासणी न करता केवळ कागदोपत्री परवानग्या देणाऱ्या संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून उत्पादन सुरू ठेवणाऱ्या कंपनी व्यवस्थापनासोबतच तपासणी न करता परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनाही या घटनेला जबाबदार धरले पाहिजे, असे संघटनांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही पुढे येत आहे. दरम्यान, मुख्य आरोपी अजूनही फरार असल्याने पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची याबाबत सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0