ग्रामिण भागातही वाढतेय वेश्यावृत्तीचं सावट
आर्थिक अडचणी, भौतिक मोह आणि सामाजिक अपयश ठरतंय प्रमुख कारण
का टा वृत्तसेवा I
नागपूर : देशातील प्रमुख महानगरे जसे की मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि नागपूर या ठिकाणी वेश्यावृत्तीचा प्रचलित मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. मात्र, अलीकडील काळात ही वेश्यावृत्ती फक्त शहरांपुरती मर्यादित न राहता ती ग्रामिण भागातही झपाट्याने पसरत असल्याचे वास्तव समोर येत आहे. यामागे फक्त आर्थिक गरज नाही, तर वाढलेली भौतिकतावादी जीवनशैली, सोशल मीडियाच्या प्रभावामुळे निर्माण झालेली चुकीची अपेक्षा आणि सामाजिक-शैक्षणिक अपयश सुद्धा कारणीभूत ठरत आहे.

विदर्भातील एका लहानशा गावात राहणारी सीमा (बदललेले नाव) ही १९ वर्षांची तरुणी, शिक्षण अर्धवट सोडून मुंबईत कामासाठी गेली होती. सुरूवातीला ती एका घरगुती कामात गुंतली होती, मात्र महागाई, मोबाईल व सोशल मीडिया यामुळे तिला झटपट पैसा आणि आधुनिक आयुष्याची लालसा लागली. ओळखीच्या माध्यमातून ती एका एजंटच्या संपर्कात आली आणि हळूहळू तिचं आयुष्य वेश्यावृत्तीकडे वळलं. आज तिच्यासारख्या अनेक तरुणी ग्रामीण भागातून बाहेर पडून अशाच मार्गावर चालू लागल्या आहेत.
वाढती समस्या,आर्थिक परिस्थितीचा प्रभाव :
शेती-रोजगाराबद्यल उदासिनता/ अपयश, बेरोजगारी, वडिलांचे व्यसन, आईचे एकटं पालकत्व, कर्जबाजारीपणा इत्यादी कारणांमुळे मुलींवर घराचा उदरनिर्वाह चालवण्याची जबाबदारी येते. ही जबाबदारी झटकन पूर्ण करण्याचा ‘शॉर्टकट’ म्हणजे वेश्यावृत्ती.
भौतिकतावाद व सोशल मीडियाचा प्रभाव :
स्मार्टफोन व इंटरनेटच्या वापरामुळे अगदी खेड्यातील मुलीही शहरातील चमकदार जीवनशैली पाहू लागल्या आहेत. ब्रँडेड कपडे, मेकअप, हॉटेलिंग, पार्टी लाइफ दृ हे सर्व दाखवून दिल्या जाणाऱ्या गोष्टींच्या मोहात त्या अनेकदा चुकीच्या मार्गाकडे वळतात.
शिक्षण आणि मार्गदर्शनाचा अभाव :
अनेक गावांमध्ये मुलींना योग्य शिक्षण किंवा व्यावसायिक प्रशिक्षण मिळत नाही. अशा वेळी जेव्हा घरून ‘पैसा आण’ असा दबाव येतो, तेव्हा त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरत नाही.

परिणाम :
1. लैंगिक शोषणाची वाढ 2. एड्स व इतर रोगांचा धोका 3. सामाजिक प्रतिष्ठा गमावणे
4. मानसिक त्रास, डिप्रेशन, आत्महत्येची प्रवृत्ती 5. कुटुंबाचे विघटन
सामाजिक संदेश : कुटुंबाने संवाद वाढवावा,
मुलांशी संवाद साधणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे.
शासनाने अधिक मजबूत योजना राबवाव्यात :
ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण, कौशल्यविकास व रोजगारासाठी विशेष योजना राबवाव्यात.
NGO आणि स्थानिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा :
गावोगावी जनजागृती अभियान राबवून, लोकांना याची गंभीरता समजावून देणे आवश्यक आहे.
तरुणींनी स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभं राहावं :
कोणताही ‘शॉर्टकट’ सुखाचा मार्ग नसतो. शिक्षण, कौशल्य आणि मेहनतीनेच आपलं भविष्य उज्वल बनवता येतं. ग्रामिण भागातील वेश्यावृत्ती ही केवळ व्यक्तीगत किंवा कौटुंबिक समस्या नाही, तर ही एक सामाजिक इशारा आहे. जर आपण सर्वांनी वेळेत पावलं उचलली नाही, तर समाजाचा पायाच हादरेल. चला, एकत्र येऊन सन्माननीय आणि स्वावलंबी पर्याय निर्माण करूया.
“जागृतीचा दीप, स्वाभिमानाचं जीवन आणि शेतीतून सन्मान”













