महाराष्ट्रात पाच वर्षांत ६७५ बिबट्यांचा मृत्यू; १९८ रस्ते अपघातात ठार
नागपूर : महाराष्ट्र राज्यात गेल्या पाच वर्षांत तब्बल ६७५ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये १९८ बिबट्यांचा मृत्यू रस्ते अपघातांमध्ये झाला असून, राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
वन विभागाच्या आकडेवारीनुसार बिबट्यांच्या मृत्यूमागील प्रमुख कारणांमध्ये नैसर्गिक मृत्यू, रस्ते अपघात, विहिरीत पडणे, विजेचा धक्का तसेच शिकारी यांचा समावेश आहे. एकूण मृत्यूंपैकी ३२० बिबटे नैसर्गिक कारणांनी दगावले, तर १९८ रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडले. याशिवाय १७ बिबटे शिकारीत आणि १२ विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले.

याच कालावधीत राज्यात १८७ वाघांचा मृत्यू झाला असून, ही संख्या बिबट्यांच्या मृत्यूच्या तुलनेत जवळपास तीनपट कमी आहे. वाघांच्या मृत्यूची वर्षनिहाय आकडेवारी अशी आहे — २०२१ मध्ये ३२, २०२२ मध्ये २९, २०२३ मध्ये सर्वाधिक ५२, २०२४ मध्ये २६, २०२५ मध्ये ४१, तर २०२६ च्या फेब्रुवारी अखेरपर्यंत ७ वाघांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी वन विभागाकडून मागवलेल्या माहितीतून ही आकडेवारी उघडकीस आली आहे.
राज्यात सर्वाधिक बिबट्यांचे मृत्यू पुणे वन विभागात (१८१) नोंदवले गेले असून, त्यापाठोपाठ नाशिक वन विभागात १६१ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वर्षनिहाय बिबट्यांच्या मृत्यूची आकडेवारी पाहता २०२१ मध्ये १६७, २०२२ मध्ये १४०, २०२३ मध्ये ७७, २०२४ मध्ये १४४, २०२५ मध्ये १३७, तर २०२६ च्या जानेवारी अखेरपर्यंत १० मृत्यू नोंदवले गेले आहेत.
मानव-वन्यजीव संघर्षाचे सर्वाधिक तीव्र स्वरूप पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात दिसून आले. २०२५ मधील ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यांत पाच जणांचा मृत्यू झाला होता.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने २०२५ मध्ये ६८ बिबट्यांना जेरबंद केले. मात्र, माणिकडोह येथील बिबट्या बचाव केंद्र पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ५० बिबट्यांना गुजरातमधील ‘वनतारा’ प्रकल्पात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.











Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0