निवडणूक आयोगाचे काम भाजप ऑफिसमधून- आदित्य ठाकरे
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मशीनचा वापर न करण्याच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगावरच हल्ला चढवला. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातून चालतो.
ठाकरेंच्या या भूमिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही बळ दिले आहे. “व्हीव्हीपॅटशिवाय निवडणुका पारदर्शक असूच शकत नाहीत,’ असे ठामपणे सांगत नांदगावकर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध केला आहे. तीन वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरले नाही, तर तो जनतेच्या लोकशाहीवरील विश्वासाला धक्का असेल असा इशाराही त्यांनी दिला.

मनसे, उबाठा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या सर्व विरोधी पक्षांनी व्हीव्हीपॅटच्या वापरासाठी जोरदार मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचा आरोप आता विरोधक एकत्रितपणे करत आहेत. व्हीव्हीपॅटशिवाय निवडणुका घेतल्यास हा वाद न्यायालयातही जाण्याची शक्यता आहे.










